Solar Agriculture Pumps : शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रकमेत सौर पॅनेल्स आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच उपलब्ध करून देणारी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना सध्या अधिक वेगाने राबवली जात आहे. डिसेंबर महिन्यात दररोज सुमारे ८४४ कृषी पंपांची स्थापना करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. Solar Agriculture Pumps
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित समस्या सोडविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. डिसेंबर महिन्याच्या २६ तारखेपर्यंत राज्यात २१,९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, दररोजची ही सरासरी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
२०१५ पासून २०२३ पर्यंत राज्यात विविध योजनांद्वारे १.८० लाख सौर पंप बसविण्यात आले होते. मात्र, केवळ मार्च २०२४ पासूनच्या आठ महिन्यांत १.५८ लाख सौर पंप बसवून महाराष्ट्राने देशात उच्चांक प्रस्थापित केला आहे.
या योजनेत प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३०% तर राज्य सरकारकडून ६०% अनुदान दिले जाते. परिणामी, शेतकऱ्यांना केवळ १०% हिस्सा भरून संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा लाभांश फक्त ५% आहे.
Solar Agriculture Pumps
फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्य सरकारने साडेदहा लाख सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यामुळे वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या लवकरच सुटेल.
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्ज मंजूर केला जातो. यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक हिस्सा भरावा लागतो. पंप बसवण्यासाठी निवडलेल्या एजन्सीमार्फत संयुक्त पाहणी केली जाते आणि नंतर कार्यादेश दिला जातो. या प्रक्रियेनंतर कृषी पंप बसविण्याचे काम पूर्ण केले जाते. तसेच, पंप बसविणाऱ्या एजन्सीवर देखभालीची जबाबदारी सोपवली जाते.
सौर पॅनेल्समधून पुढील २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना वीज बिलाची चिंता करण्याची गरज नसते. या पंपांमुळे शेतकऱ्यांना पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत नाही, त्यामुळे दिवसा कोणत्याही वेळेस सिंचन करता येते. यामुळे दिवसा वीज पुरवठ्याच्या मागणीचेही समाधान होते.